बांगलादेशातील अस्थिरतेमागे भारत   

महमद युनूस यांचा कांगावा

ढाका : बांगलादेशातील हंगामी सरकार आणि लष्करातील तणाव सार्वजनिक झाला आहे. आपली सत्ता गमावण्याच्या भीतीने हंगामी सरकारचे प्रमुख महम्मद युनूस यांनी भारतविरोधी घोषणाबाजी सुरू केली आहे. बांगलादेशातील अस्थिरतेमागे भारतच आहे, अशी गरळ त्यांनी ओकली आहे. 
 
बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर युनूस यांनी राजकीय पक्ष आणि इतर संघटनांसोबत बैठक घेतली. या बैठकीत राजकीय पक्षांनी सार्वत्रिक निवडणुका लवकर घ्याव्यात, अशी मागणी केली. तथापि, युनूस यांनी निवडणुकीबाबत कोणताही रोडमॅप दिला नाही. उलट भारताविरोधात गरळ ओकली. ते म्हणाले,अवामी लीगच्या कारवायांवर बंदी घालण्यात आल्यापासून परिस्थिती अस्थिर करण्यासाठी अधिक प्रयत्न केले जात आहेत. आपण यापासून स्वतःचे रक्षण केले पाहिजे. देशात आणि देशाबाहेर युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे देश पुढे जाऊ शकत नाही. आपण पुन्हा गुलामगिरीकडे जात आहोत. बांगलादेशातील सध्याचे राजकीय संकट भारताचे कारस्थान आहे. 
 
जुलै २०२४ नंतर बांगलादेशमध्ये झालेले बदल भारत स्वीकारत नाही. भारत आपल्याला एका दिवसात संपवू इच्छित आहे आणि त्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे, असेही ते म्हणाले. 
 

Related Articles